Friday, 12 February 2021

सखा(लघुकथा)

                             सखा

"ए भांडी एएए "अशी जोरदार आरोळी कानी आली आणि सुमतीताई लगबगीने बाल्कनीत आल्या आणि त्या भांडीवालीला आवाज देऊ लागल्या.ती जराशी पुढे येऊन बाल्कनीखाली उभी राहिली,पण ती नेहमीची नसल्याने त्यांनी तिला विचारले,"तू नवीन आहेस का?रखमा येत नाही का आता?"
               "न्हाय जी ,तिचं वय झालं जी आता तर म्या येते ,तिची मुलगी." "ये वर ये जिन्याने ",सुमतीताई बोलल्या.
ती तिचं समान आवरत वर आली आणि दरवाज्यातच एक बाजूला बसली.गेले जवळजवळ वर्षभर त्या इथे नव्हत्या त्यामुळे त्यांना रखमाबद्दल काहीच माहीत नव्हतं.
                "तुझं नाव काय?"सुमतिताईंनी हसून विचारलं."जी म्या लक्षुमी",अरे वाह दिसतेस पण अगदी लक्ष्मीसारखी,असे बोलून त्यांनी तिचं निरीक्षण करायला सुरुवात केली.रखमापेक्षा उजळ वर्ण,रेखीव चेहरा,चांगला बांधा आणि उंचपुरी शिवाय चेहऱ्यावर एक वेगळच तेज अशी लक्ष्मी त्यांना पहिल्या भेटीतच खूप आवडली.नंतर तिच्याशी गप्पा मारत स्वतःकडचे कपडे दाखवून एक छोटंसं भांड घेऊन त्यांनी तिचा निरोप घेतला.
               लक्ष्मी गेली तरी तिचे विचार काही त्यांच्या डोक्यातून लवकर गेले नाही."हिरा हा नेहमी कोळशाच्या खाणीतच जन्म घेतो ",त्या स्वतःशीच बोलल्या आणि आपल्या कामाला लागल्या.दोन तीन दिवसांनी त्यांना परत तिचा आवाज आला,त्या तिला बघण्यासाठी बाल्कनीत गेल्या त्यावेळी ती कोपऱ्यावर असलेल्या झाडाखाली एका तरुण  मुलाच्या  मदतीने भांड्यांची पाटी खाली उतरवत होती.त्या दोघांनी तिथे जमिनीवरच बैठक मारली होती आणि सावलीला दोन घटका विसावली होती.
               थोडा वेळ गप्पा गोष्टी करून ती दोघे आपल्या मार्गांनी निघून गेले.असेच दिवसं मागून दिवस चालले होते,कधीतरी लक्ष्मीचा आवाज येई पण ती दूर गेलेली असे ,तर कधी झाडाखाली सावलीत बसलेली असे.एके दिवशी जवळजवळ पंधरावीस दिवसांनी त्यांनी तिचा आवाज ऐकला आणि बाल्कनीत येऊन तिला पाहताच त्यांना आश्चर्याचा धक्का बसला,कपाळावर मोठं कुंकू ,गळ्यात डोरल काठपदाराची नऊवारी गुढग्याच्या खाली नेसलेली.तिचं लोभसवाणे सौंदर्य आणखीनच खुलुन दिसत होतं.
            असेच दिवसामागून दिवस जात होते,लक्ष्मी आताही नेहमीसारखी भांडी घेऊन येत होती.कधीतरी ती त्या माणसाबरोबर झाडाखाली सावलीला गप्पा मारताना दिसे.तो माणूस कधीकधी विक्रीसाठी फळाची गाडी आणायचा मग त्यातलं एखादं फळ तिला देऊन,आपापल्या मार्गांनी निघून जात असे.
            लक्ष्मीचं येणं,त्या दोघांचे असं घटकाभर झाडाखाली विसावा घेणं आणि नंतर आपापल्या मार्गांनी निघून जाणं ,हे सर्व सुमतीताई आपल्या बाल्कनीतून पाहत असतं.तिच्याबद्दल त्यांना आपुलकी होतीच आता हे कुतूहल ही त्यांना शांत बसू देत नव्हते.परंत तिला याबद्दल काही विचारायला त्यांना संकोच वाटत होता.अशातच गावावरून भावाचं पत्र आलं आणि त्यांना गावी जावं लागलं.
              गावचे सर्व कामे आटोपून येण्यात त्यांना जवळजवळ एक महिना लागला.गावावरून आल्यावर एक दोन दिवसांनी त्यांना लक्ष्मीची आठवण येऊ लागली आणि त्या बाल्कनीत तिच्या येण्याच्या वेळी चक्कर टाकू लागल्या.
सलग चार दिवस वाट बघितल्यानंतर ती त्यांना दिसली आणि त्यांच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना.
            थोडीशी कृश झालेली,पांढर कपाळ आणि अंगावर पांढरी सुती साडी,तिला तसं बघून त्यांना खूप वाईट वाटलं.तिला बोलावून तिची चौकशी करावी असा त्यांना खूप वाटलं पण धक्क्याने हाती कृती काही घडली नाही.
नंतर दोन दिवसांनी परत तिचा आवाज आला त्यावेळी सुमतीताई बाल्कनीत गेल्या तर ,नेहमीसारखी ती कोपऱ्यावरच्या झाडाखाली सावलीला बसलेली आणि तोच फळवाला तिच्या पाटीजवळ बसून गप्पा मारत आणि फळं खात त्यांना दिसली.त्यांना त्यांच्या डोळ्यावर विश्वासच बसेना.मनातलं कुतूहल काही गप्प बसू देईना.
          तरीही,त्यांनी याबद्दल तिला आता काही विचारू नये असं ठरवलं आणि आपल्या कामाला लागल्या.एके दिवशी अचानक त्या बाल्कनीत उभ्या असतानाच लक्ष्मी खालून जाताना दिसली आणि त्यांनी तिला आवाज देऊन वर बोलावून घेतलं.नेहमीसारखा वर येऊन लक्ष्मी दरवाज्याजवळ बसली.तिच्यासाठी पाणी आणून त्यांनी तिची चौकशी केली,"काय सांगायचं बाई जी माझा मालक लई दारू प्यायचा ,त्यातच त्याची किडनी गेली आणि तो गेला."आता भांड्यांचा धंदा बंद करून हा काच सामानाचा धंदा सुरू केलाय.कसातरी आला दिवस काढतुय म्या".
              "हे बघ लक्ष्मी तू धिर सोडू नको,सर्व काही नीट होईल असे म्हणून सुमतीताई ने तिला थोडेसे पैसे देऊ केले आणि तिचा निरोप घेतला.लक्ष्मी गेली तरी तिचा विचार काही त्यांच्या डोक्यातून जात नव्हता.तरुणपणीच हे असं वैधव्य उभं आयुष्य पडल आहे पोरीसमोर कशी करणार ती,त्या स्वतःशीच पुटपुटल्या आणि आपल्या कामाला लागल्या.
            दिवसामागून दिवस जात होते,लक्ष्मीच येणं ,आरोळी देणं ,कधीतरी झाडाखाली विसावा घेणं नेहमीसारखेच सुरू होतं.एके दिवशी अचानक सुमातीताईंनी  लक्षमी तिच्या नेहमीच्या वेळी दिसली पण आमूलाग्र बदललेली.कपाळावर कुंकवाचा टिळा,हातात हिरवा चुडा आणि गुडग्यापर्यंत नेसलेली काठपदाराची नऊवारी साडी.
ताईंचा त्यांच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना ,त्यांनी लगेचच तिला आवाज देऊन वर बोलावून घेतलं.
                 नेहमीप्रमाणे लक्ष्मी वर येऊन दरवाज्याजवळ बसली,ताईं म्हणाल्या ,"अरे वाह , तू दुसरं लग्न केलं तर","खूप छान झालं."
"काय करतो तुझा नवरा"?सुमातीताईंनी विचारले
"जी तो बांधकामाच्या जागी रोजंदारीवर जातो",लक्ष्मी म्हणाली
थोडंस आश्चर्य वाटून ताई बोलल्या,"म्हणजे तू त्या फळवाल्याशी नाही लग्न केलं".माफ कर हं पण मला वाटलं तू त्याच्याशी लग्न करशील.
          "त्याचं काय आहे जी तो फकतस माझा मैतर हाय,माझा सखा आहे .माझ्या सुखदुःखात माझ्यासोबत असणारा ,कसलीही अपेक्षा न ठेवता मला मदत करणारा.
सखा हाय तोवर आम्ही आनंदी हाय,आम्हाला एकमेकांची काळजी आहे कंची बी अपेक्षा न ठिविता.एकदा का सखा नवरा झाला की,हक्क,अरेरावी,अपेक्षा आणि मालकीभावना आली अन प्रेम तर लांब पण कधी कधी आपुलकी बी उरत नाही वरती फक्त जुलमाचा रामराम."
           त्यात माझं हे असं दुसरं लग्न त्यात त्याचा काय दोष म्हणून नाही केलं जी ."
           ताईंनी या वेळी तिच्याकडून किरकोळ सामान घेतलं आणि तिला निरोप देऊन बाल्कनीत येऊन  उभ्या राहिल्या.एक अडाणी मुलगी पण वास्तवाचे चटके सोसून
किती प्रगल्भ झालेले तिचे विचार.त्या कितीतरी वेळ तिच्या विचारात हरवून गेल्या.त्यांना त्यांचे तरुणपणीचे दिवस आठवले.त्याकाळाप्रमाने ठरवून झालेले लग्न,यजमानांच्या अबोल आणि विचित्र स्वभाव.घर आणि ऑफिस कसरत करत संभाळलेली नोकरी.नोकरी करत असताना सोबतचे पुरुष सहकारी किती चांगले होते,प्रसंगी उशीर होत असेल तर वाटून घेतलेली कामे,मुलांच्या कॉलेज ऍडमिशनच्या वेळी निस्वार्थ पणे केलेली मदत.बॉस ने कौतुक केल्यावर ते साजरे करण्यासाठी ऑफिसमध्येच एकत्रपणे केलेला चहा नाश्ता(म्हणजे आजच्या भाषेत पार्टी).
         पण ऑफिस व्यतिरिक्त बाहेर कुठे कार्यक्रमात नवरासोबत असताना सहकारी भेटले तर फक्त औपचारिक ओळख यापलीकडे काही नाही.नवऱ्यासमोर बोलण्याची पण हिम्मत व्हायची नाही.तो कसा रिऍक्ट होईल आणि गैरसमज होतील ही भीती.अश्या एक ना अनेक विचारांत त्या गुरफटून गेल्या.नेमकं त्याचवेळी त्यांचे यजमान वामकुक्षी आटोपून चहासाठी ह्यांना हाका मारत होते.
              शेवटी स्वतः बाल्कनीत येऊन ताईंना समाधी अवस्थेतेतून बाहेर काढून त्यांनी त्यांची चौकशी केली.काही नाही हो समोर झाडावर बघा त्याचिमणीने किती छान घरटं बांधलं आहे आणि आत दोन पिलही दिसत आहे तेच बघत होते.तुम्ही बायका पण ना शेवटी घर आणि मुलं यातच अडकलेल्या असता नवऱ्याचा काही विचार आहे की नाही ,अग चहा देतेस ना मित्र वाट बघत असतील माझी मैदानावर.आता आणते हं,तुम्ही तयारी करा म्हणत सुमातीताईंनी स्वयंपाकघर गाठले आणि नेहमीच्या सरावाने कामाला लागल्या.

रजनी✍️




     


No comments:

अलक -अनामित संबंध

                 अनामित संबंध त्यांचे लग्नानंतरही तिने जपले होते. दरवेळी माहेरी गेल्यावर एकदातरी त्याच्याशी हितगुज करायला ती जायची. तिच्या य...