सरते वर्ष दोन हजार वीस
पूर्ण जगायचेच राहिले
टप्प्या टप्प्याने इथे
जगण्याचे मापदंड बदलले
सानथोर सगळ्यांच्या तोंडी
मास्क विराजमान झाले
कोरोना,पँडेमिक ,लॉकडाऊन
नवे शब्द जिभेवरी आले
कोरोनाचा वाढला ताप
सॅनिटायझर चा वाढला खप
झाल्या शाळा ऑनलाईन
मुंबईची थांबली लाईफलाईन
हजारो मैल चालत जाऊन
माणसं घरट्यात परतली
माणुसकीला काळिमा फासत
राजकारणे गलिच्छ रंगली
मंदिरे बंद झाली, देव
योद्धय्यांच्या रुपात अवतरले
माणसातल्या देवत्वाचे
या समयी दर्शन घडले
टाळ्या थाळ्या वाजल्या अन
दिवे उजळले जागोजागी
योजना पॅकेजची उधळली खैरात
तरी वाढली फक्त बेरोजगारी
आत्मनिर्भरतेचा नारा देऊन
त्यांनी केली स्वतःची सुटका
काय सोसले सर्वांनी
त्यांना कल्पना तरी आहे का?
सरते वर्ष दोन हजार वीस
सर्वांच्याच लक्षात राहील
स्वतः सोबत माणूस आता
निसर्गाचेही हित पाहिलं

No comments:
Post a Comment